वस्त्रनगरी वृत्तसेवा
पंढरपूर : आषाढी वारी आणि पांडुरंगाची भेट हा दुग्ध शर्करा योग आषाढी वारीची वारकरी भक्त वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. ज्यांना वर्षभर पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाता येत नाही ते सुद्धा आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरला जातात. या वर्षाच्या आषाढी वारीने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत.सुमारे 28 लाख भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे.आषाढी वारीसाठी लाखो भावीक प्रत्येक वर्षी पंढरपुरात दाखल होतात.

त्यांची संख्या मोजण्यासाठी यावेळी प्रथमच एआय तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली.आषाढी एकादशी दिवशी सकाळी सहा ते रात्री बारा वाजे पर्यंत हेड काऊंट करण्यात आले.त्यामध्ये 27 ते 28 लाख भाविक उपस्थित असल्याची नोंद झाली आहे.6 हजार एसटी आणि 100 रेल्वेच्या फेऱ्यातून हे भक्त आले होते. दर्शनानंतर अनेक भक्त परतले.त्यामुळे गर्दीही नियंत्रित राहिली.भक्तांच्या बरोबरच 50 हजारांहून जास्त ट्रक, टेम्पो, कार आणि इतर वाहने आली होती. चंद्रभागेकडे येणारा मार्ग,दर्शन रांग आणि मंदिर परिसर आदी सहा विभागांमध्ये ड्रोन सोडून भक्तांची मोजणी करण्यात आली.चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा महापूर आला होता पाय ठेवण्याची जागा नव्हती. उत्तम नियोजन केल्यामुळे सर्वांना चंद्रभागे मध्ये स्नान करून दर्शन घेता आले.आजवरच्या इतिहासातील या वर्षाची गर्दी ही विक्रमी अशीच होती.पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या हेड काऊंट ला दुजोरा दिला आहे.
