वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : शहरातील नागरिकांना महत्त्वाच्या सेवांपैकी असलेल्या जन्ममृत्यू विभागात वाढत्या गर्दीमुळे व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे ठोस मागणी केली आहे.
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, जन्ममृत्यू विभाग हा दररोज सर्वसामान्य नागरिकांना लागणारा संवेदनशील विभाग असून येथे कार्यालयीन जागा व मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच लिपिकांची संख्या मर्यादित असल्याने नोंदी व प्रमाणपत्रे मिळण्यात विलंब होतो.यावर उपाय म्हणून विभागाचे सुशोभीकरण करून स्वच्छ, सुसज्ज व सोयीस्कर वातावरण निर्माण करावे, तसेच लिपिकांची संख्या वाढवून सेवा अधिक तत्पर व सुलभ कराव्यात, अशी ठोस मागणी उमाकांत दाभोळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

