सुशीलादेवी साळुंखे यांच्या जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : डी. के. ए. एस. सी. कॉलेज इचलकरंजी येथे संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा मंगळवार, दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी वाङ्मय मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांनी ” श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या एकूणच प्रवासात संस्थामातांचे योगदान अमूल्य आहे. ससंस्थेच्या निर्मितीपासून स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत संस्थेच्या प्रत्येक घटकावर मुलाप्रमाणे प्रेम करून संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांनी आपल्या मायेने ही संस्था जपली आणि वाढवली. अशा वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींची उजळणी व्हावी व त्यांच्याप्रती कृतज्ञ होता यावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन आहे.” असे मनोगत व्यक्त केले.

संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या जीवनकार्यावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली भाषणे सादर केली. स्पर्धेचे परीक्षण प्रा. निलेश जाधव व प्रा. संदीप पाटील यांनी केले.

संस्था प्रार्थना आणि प्रतिमापूजनाने सुरू झालेल्या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक वाङ्मय मंडळ समन्वयक प्रा. रोहित शिंगे यांनी केले. यावेळी दुपार सत्र प्रमुख प्रा. डी. ए. यादव, सकाळ सत्र प्रमुख प्रा. व्ही. पी. पाटील, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. पी. ए. पाटील, मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. अर्चना नंदगावे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. अंजली उबाळे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. अपर्णा कांबळे व प्रा. प्रथमेश गवळी यांच्यासह वांग्मय मंडळातील सर्व सदस्य यांनी सहकार्य केले. या स्पर्धेसाठी गुरुदेव कार्यकर्ते, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *